ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते, मराठी तुमची माता..............................
२७ फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण सारे मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतोय. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विचार केला कि, " पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका." हा त्यांचा पटका आठवतो. कारण गांभीर्याने विचार केला कि ह्या पटक्यात कुसुमाग्रजांनी मराठीची दैन्यावस्था मांडली हे जाणवते. आपल्या शासनाने त्यातल्या काही ओळी शिधापत्रिकेवर छापल्या, आणि कर्तव्य पूर्तीचा श्वास घेतला. पण मराठीचे दशावतार आजही संपले नाहीत. मराठी भाषेची उपेक्षा आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत आहे. ह्या भाषेच्या जन्मापासून हि भाषा लढते आहे. तिचा लढा अखंड चालू आहे. तो अजूनही संपलेला नाही; पण ज्या अर्थी भाषा लढत आहे आणि अजूनही टिकून आहे त्या अर्थी हि भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवेल. मराठी भाषा दिनानिमित्त घेतलेला हा आढावा. मराठी बद्दल लिहितेय पण लेखाची सुरवात काय करू? आरंभापासून प्रारंभ करू कि प्रारंभापासून आरंभ करून सुरवात करू तेच कळत नव्हते कारण आमची मराठी अनादी अनंत आहे. भाषा म्हटले कि ती नदी सारखी असते. जमिनिच्या पोटातून अचानक उसळलेल