सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ६


मागील भाग

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात उल्लेखनीय असे नाव नसले तरी विसरता येणार नाही असे नाव म्हणजे अहिरीची राणी लक्ष्मीबाई. मध्य प्रांतातील सातपुडा व विंध्य पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यात राहाणार्‍या ह्या गोंडांचे सहकार्य हा सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक संस्मरणीय अध्याय आहे. मध्य प्रदेशातील चांदा जिल्ह्यात अहिरी येथे वास्तव्य करणार्याय राणी लक्ष्मीबाईचा इतिहास हा झांशी, अवध, रामगढ या प्रमाणे रक्तरंजीत नसला तरी त्याचे महत्व कमी होत नाही त्यांच्या या स्वातंत्र्याने प्रेरित झालेल्या जीवन पटावर प्रकाश टाकायलाच हवा.
अहिरीची राणी लक्ष्मीबाई पूर्ववृत्तांत
मध्य प्रदेशातील चांदा जिल्ह्यात अहिरी हि सर्वात मोठी जमीनदारी होती. तेथील जमीनदाराला राजा हा किताब दिला होता. मध्य प्रदेशातील सातपुडा व विंध्य पर्वतांच्या आसपास असल्यामुळे आपला निभाव त्या निबिड जंगलात लागणार नाही ह्याचा विचार करुनच ब्रिटिशांनी ते संस्थान हडप केले नाही परंतु त्यांच्याशी सलोख्याचे संबध ठेवले. याचा फायदा मात्र राणीने उठवला. आपली ताकद कमी पडेल हे जाणुन ती प्रत्यक्षात लढ्यात उतरली नसली तरी तीने बापुराव व व्यंकटराव यांना साथ देउ केली.
बापुराव व व्यंकटरावांचे बंड
उत्तरेतुन सुरु झालेल्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे मध्य प्रदेशातही पसरले. या प्रदेशातील अनेक ठिकाणाप्रमाणे आहिरी जमिनदारीच्या हद्दीत रहाणारा मोलामपल्लीचा जमिनदार व्यंकटराव यानेही आपल्या हद्दीत ब्रिटिशांविरोधात बंडाचे निशाण फडकवले. त्याला साथ दिली ती बापुरावने. आपल्या आसपासच्या मारीये - रोहिले- गोंड अशा सर्व आदिवासीना गोळा करुन त्यांच्या फौजा उभ्या केल्या. याच फौजांच्या सहाय्याने त्याने बराचसा प्रदेश ब्रिटिशांच्या तावडीतुन स्वतंत्र केला. जे जमीनदार त्यांच्या उठावात सामिल झाले नाहीत त्यांच्या जमीनी काबीज केल्या. हि गोष्ट ब्रिटिश सरकारला कळताच त्यांनी Captain Shakespeare च्या नेतृत्वाखाली त्यांच्या बंदोबस्तासाठी सैन्य रवाना केले. परंतु निबीड अरण्य आणि दर्यारखोर्यांसचा प्रदेश बघुन आपणाला बापुराव व व्यंकटराव यांचा बंदोबस्त शक्य नाही हे पाहुन Captain माघारी फिरला.
राणी लक्ष्मीबाईचा लढाईतील सहभाग
त्या भागात आहिरी ही सर्वात मोठी जमिनदारी होती. एवाढ्या मोठ्या जमिनदारीवर त्यावेळी राणी लक्ष्मीबाईची सत्ता होती. तिच्या सक्रिय सहकार्यावाचुन बापुराव व व्यंकटराव यांना पकडणे शक्य नव्हते. निबिड आरण्याचा फायदा घेउन रोहिले - मारिये व गोंड हे गनिमी काव्याने लढत, त्यामुळे ब्रिटिशांच्या तोफा व बंदुकांचा उपयोग होत नव्हता; म्हणुन ब्रिटिशांनी लक्ष्मीबाई वर दडपण आणण्यास सुरवात केली. तसेच - " आपले आजवरचे संबंध लक्षात घेता आपण तात्काळ त्या दोघा बंडखोरांना पकडुन सरकारच्या स्वाधीन करावे." हा तातडिचा खलिता Peter नावाच्या ब्रिटिश अधिकार्यान बरोबर लक्ष्मीबाईकडे पाठवला, त्यावर तिने काहिहि प्रतिक्रिया व्यक्त केली नाही असे तीन ते चार खलिते झाले तरी तिने हलचाल दाखवली नाही.
आता मात्र ब्रिटिशांना तिच्याविषयी शंका यायला लागली होती कि ती त्या बंडखोरांना सहाय्य करतेय, तिच्यावर तसा आरोपही त्यांनी केला परंतु तीने आपले मौनव्रत सोडले नाही. ती आपल्या निश्चायापासुन अढळ राहीली व ती त्या निबीड आरण्याचा फायदा घेत बापुराव व व्यंकटराव यांना मदत करत राहीली, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांना हत्यारे तसेच आर्थिक मदत पुरवणे, ब्रिटिशांच्या बातम्या पुरवणे, वेळ - प्रसंगी स्वत:च्या वाड्यात आश्रय देणे. अशी मदत ती करतच राहीली ब्रिटिशांच्या हलचालींची माहिती मिळत असल्याने ब्रिटिशांना चकवणे व त्यांचा हल्ला निकामी करणे सोपे जात होते.
नागपुर Commissioner चा हुकुम
नागपुर Commissioner ने २८ जुन १८५८ ला चांद्याच्या Deputy Commissioner ला लिहिलेल्या पत्रात राणी लक्ष्मीबाई विरुध्दचा संताप त्यांनी व्यक्त केला – “बापुराव व व्यंकटरावाला पकडुन आमच्या स्वाधीन करण्याबाबत तिने जी चालढकल व टाळाटाळ चालविली आहे ती यापुढे आम्हाला सह्न करणे शक्य नाही. त्याला पकडुन देण्याचे अश्वासन तिने आम्हाला दिले आहे ते जर ती पुर्ण करणार नसेल तर तिच्याविरुद्ध ताबडतोब कड्क उपायांचा अवलंब करावा. या प्रकरणात तिने केलेल्या या अपराधाबद्दल व बंडखोरांना आश्रय दिल्याबद्दल तिला कडक शासन करुन जमिनदारी काढुन घेण्यात यावी. याची तिला ही जाणीव करुन द्यायला हवी. याच पत्राचा विचार करुन चांद्याच्या Deputy Commissioner ने राणीला एक पत्र लिहिले, "आपण त्या दोघा बंडखोरांना पकडुन द्यावे अन्यथा तिची जमिनदारी जप्त केली जाईल तसेच बंड करणार्यांंना आश्रय दिल्याबद्दल तिच्यावर खटला भरण्यात येईल. तरीही ती तिच्या निश्चयापासुन ढळली नाही. जुलै १८५७ पासुन जुन १८५८ पर्यंत तिने ब्रिटिशांना चकवुन बापुराव व व्यंकटराव या क्रांतीविरांना मदत केली.
परंतु ह्या सर्व पत्रव्यवहारापुर्वीच दोन महिने आधी २६ एप्रिल १८५८ ला याच प्रकरणी नागपुरच्या Commissioner ने पुढिल प्रमाणे हुकुम काढला "आमच्या विरुध्द हत्यार उपसणार्यार सर्व लोकांना ताबडतोब फासावर चढवण्यात यावे. तसेच या बंडात सामील असणार्या इतर लोकांचे जे खटले तुमच्यापुढे चालतील त्यांनाही फाशीची शिक्षा देउन ती तात्काळ आमलात आणण्यात यावी. या बंडखोरांच्या पुढार्यांंना जास्तित जास्त कठोर पणे वागवण्यत यावे. नागपुरच्या Commissioner च्या अशा प्रकारच्या हुकुमांनी लक्ष्मीबाईचा निश्चय ढळाला नव्हता.ती त्यांना मदत करतच होती. या सर्वामुळे ब्रिटिश सरकारने तिच्या जमिनदारीवर छापे घालण्यास सुरुवात केली परंतु तीची गंभिरता तुस भर हि ढळली नाही. तिच्या या गंभिर वर्तानामागे स्वातंत्र्यकांक्षेचा किरण दडला नव्हता का?
फितुरीचा शाप लाभलेली आणखी एक शो़कांतीका
वर्षभर ब्रिटिशांना जेरीस आणणारे व त्यांच्या सत्तेविरुद्ध लढा देणार्‍या क्रांतीविरांना अखेरीस फितुरीचा शाप भोवला. लक्ष्मीबाईच्या हाताखालील माणसात फितुरी संचारली व त्याने बापुराव ला पकडुन इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यास चांदा जेल मध्ये नेत असताना मोठ्या शिफातीने आपली सुटका करुन घेतली व पळाला त्या नंतर पुन्हा २ महिन्यांनी सप्टेंबर १८५८ ला ब्रिटिशांच्या हाती लागला. यावेळी ब्रिटिशांनी वेळ न दवडता त्यास ताबडतोब फासावर लटकवले. पण बापुरावच्या फाशीने त्या भागात वर्षभर धुमसलेला अग्नी शांत झाला नव्हता तो व्यंकटराव या नावाने अजुनही तसाच भडकलेला होता. खालील नकाशावरुन लक्षात येईल कि केवढा मोठा भाग ह्या दोन क्रांतीकारकांनी हदरवुन सोडला होता.
1857 Gond Kingdom map.JPG
फक्त चांदाच नाही तर अजुबाजुचा प्रदेश पण त्यांनी क्रांतीमय करुन सोडला होता आणि ह्या कामी मोलाची मदत झाली ती आहिरीची जमिनदारीन लक्ष्मीबाईची. आपल्या भागात फितुरी झाली आहे हे कळल्यावर जमिनदारीन लक्ष्मीबाईने लगेच व्यंकटरावाची तेथुन बाहेर पडण्याची सोय केली. तेथुन तो व त्याचे साथी बस्तर राज्यात शिरले तो लढाई करतच होता.चांदा व बस्तर बाजु-बाजुला असल्याचा फायदा घेत लक्ष्मीबाई त्याला मदत करतच होती. मार्च १८५९ मधल्या ब्रिटिश अधिकार्‍यांच्या पत्रावरुन सिद्ध झाले की, त्यावेळी नविन फौज उभारुन खुद्द चांद्यावरच चाल करुन जाण्याच्या योजना व्यंकटराव आखत होता आणि याला पाठिंबा होता तो लक्ष्मीबाईचा.
आभाळच फाटले
पण सगळीकडे आभाळच फाटले तो एकटा त्या फाटक्या आभाळाला ठिगळे कशी लावु शकणार होता. १८५९ पर्यंत ब्रिटिश सत्तेचे आसन सुस्थिर झालेच होते. तरीही बस्तरच्या राजाने त्याला आपल्या हद्दित खुप धुमधाम चालु दिली. शेवटी सगळीकडचाच १८५७ चा पेटलेला स्वातंत्र्यसंग्राम विझत चाललेला बघुन हि आग आपल्या राज्यात नको म्हणुन बस्तरच्या राजाने व्यंकटरावाला पकडुन दिले. व आपले बस्तरचे स्थान बळकट केले. शिरस्त्या प्रमाणे व्यंकटरावाला फाशीची शिक्षा व्हायची परंतु त्याची आई नागापल्ली व जमिनदारीण लक्ष्मीबाई ने ब्रिटिशांपुढे जोर लावुन मध्यस्थी केली त्यांच्या विंनतीला मान देउन ब्रिटिश सरकारने व्यंकटरावाला काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. पण हि मध्यस्थी केल्याने लक्ष्मीबाईचा पाठींबा होता हे सिद्ध झाले. त्यामुळे ब्रिटीशांनी तिची जमिनदारी जप्त करुन तिच्यावर देखील खटला भरला. दुर्दैवाने हा खटला भरल्यानंतर लक्ष्मीबाईचे काय झाले ह्याची नोंद इतिहासात कुठेच नाही. असे असले तरी तिचा त्याग कमी होत नाही.



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

  1. त्यांना मानाचा मुजरा
    त्यांची सरकार दप्तरी नोंद नाही ह्याचा अर्थ इंग्रजांनी काहीतरी काळेबेरे केले असावे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!