१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - २
१८५७ चा भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा पहिला ब्रिटीश विरोधी संग्राम होता. आता त्या संग्रामाला १५३ वर्षे लोटली. १५ ऑगस्ट २०१० ला भारतीय स्वातंत्र्याला ६३ वर्षे पूर्ण होतील.
या भारतीय स्वातंत्र्याला स्त्रियांनीच चेतना दिली होती. हा इतिहास सर्वश्रुत नाही. या युद्धात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रिया म्हणून झाशीची रणी लक्ष्मीबाई, अवधाची बेगम हसरतमहल व दिल्लीच्या सम्राट बहादूरशहाची बेगम झीनतमहल यांचीच नवे सामन्यात: ज्ञात आहेत. त्यांचे कर्तुत्व थोर आहेच, पण अशा आणखीही कितीतरी महिला भारताच्या सर्वच विभागात त्याकाळी चमकून गेल्या.
कानपूरची कलावंतीण अझीजन, तुळसापूर व रामगड येथील राण्या, अहिरीची जमीनदारीण लक्ष्मीबाई, ग्वाल्हेरची बायजाबाई शिंदे, कोल्हापूरची ताईबाई, नागपूरची बाकाबाई भोसले, नरगुंद येथील राजमाता यमुनाबाई आणि राजपत्नी सावित्रीबाई, मोतीबाई, मुंदर, सुंदर, झलकारी, काशी, ललिता बक्षी हि झाशीच्या वीरांगना खाणीतील नारीरात्ने आदी महिलांची नामावली लहान नाही. या सर्व महिलांनी स्वातंत्र्य संग्रामाचे मांगल्य पूर्णपणे ओळखले होते व म्हणूनच त्यात आपणहून उडी घेण्यात त्यांना कोणत्याही प्रकारची दिक्कत वाटली नाही.
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील आणखी एक विशेष म्हणजे, गुजरात माळवा, मध्यप्रदेश, दक्षिणेतील अहमदनगर, नाशिक हे जिल्हे व हैद्राबाद राज्यातील काही प्रदेश आदी ठिकाणच्या भिल्ल, गोंड, कोळी, मारिया, माकानी, इत्यादी आदिवासी समाजाची इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेली उठावणी. परंतु त्याहीपेक्षा विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या कामात तथाकथित मागासलेल्या या समाजातील स्त्रियांनीही फार मोठा भाग घेतला.
स्वत:च्या सैनिकांसाठी भोजन तयार करणे, शत्रू पक्षाकडील बातम्या काढणे, शत्रू पक्षाकडे खोट्या व भ्रामक बातम्या पसरविणे; तसेच कित्येक प्रसंगी हातात शस्त्र घेऊन इंग्रज फौजेशी मुकबला सुद्धा करणे आदी सर्व कामात या महिला प्रचंड संख्येने आणि शत्रूला दहशत बसावी इतक्या निकराने सामील झाल्या होत्या. असीम स्वातंत्र्या निष्ठा आणि असीम राष्ट्रप्रेम यांचा संयुक्त अंत: प्रवाह समस्त भारतीय महिलांच्याहि मनोभूमीतून त्या काळी असा खळखळून वहात होता.
१८५७ च्या संग्रमातला भारतीय महिलांचा इतिहास मोठा उज्ज्वल, उदात्त व स्फूर्तीदायक आहे. तो उपलब्ध माहितीच्या आधारे माननीय हरिहर वामन देशपांडे यांनी " सन १८५७ च्या वीर महिला" ह्या पुस्तकात १९५८ साली लिहून ठेवला आहे. हिंदू - मुसलमान - आदिवासी आदींनी या स्वातंत्र्य युद्धात एकत्रितपणे भाग घेऊन भारताला पारतंत्र्यातून मुक्त केले. हा इतिहास आजच्या पिढीला माहित व्हावा हे उद्दीष्ट आहे.
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
Comments
Post a Comment